देवगड माहात्म्य - श्री दत्त मंदिर, श्री क्षेत्र देवगड

महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे. प्रभू रामचंद्रांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या भूमीत नराचा नारायण होण्याच्या अलौकिक उत्क्रांतीला गतिमान करणाऱ्या संतांनी सर्वसामान्यांना सदाचरणाचा मार्ग दाखविला आहे. अतिशय घनघोर आक्रमणांच्या अंधकारमय काळातही लोकांची जीवन जगण्याची आस्था आणि मुल्यांवरील श्रद्धा कायम ठेवण्याचे महान कार्य संतपरंपरेने केले आहे.

संतांच्या वास्तव्याने पावन झालेल्या या भूमीत विविध पुण्यपावन तीर्थक्षेत्रांमध्ये नेवाशाजवळील श्री दत्त देवस्थान देवगड हे एक अग्रगण्य देवस्थान आहे. अमृतवाहिनी प्रवरा नदीच्या काठावर वसलेले हे देवस्थान म्हणजे भक्तांसाठी भूलोकीची शांतता, पावित्र्य आणि श्रद्धेचा भव्य आविष्कार आहे.

“पुण्यसलीला प्रवरा नदी ही अमृतवाहिनीच समजली जाते.”

अगस्ती ऋषींच्या तपोभूमीतून उगम पावलेली प्रवरा नदी नेवासा येथे संत ज्ञानेश्वरांच्या भक्तीपरंपरेचा ठेवा सामावून घेत दक्षिण गंगा गोदावरीशी एकरूप होते. हा दिव्य संगम देवगडजवळच पाहावयास मिळतो. आज हे देवगड सर्व भक्तिसंप्रदायाचे आकर्षण बनले आहे.

नेवाशापासून अवघे १४ कि.मी. अंतरावर, मुरमे गावाजवळ उंच ठिकाणी वसलेले देवगड रमणीय निसर्गसौंदर्य, वळसा घालून जाणारी प्रवरा नदी आणि नितांत पवित्र वातावरण यामुळे अत्यंत आकर्षक वाटते.

या देवस्थानाचे कर्ते करविते महान तपस्वी संत पू. किसनगिरी बाबा यांचे चरित्र भक्तांना प्रेरणा देणारे आहे. त्यांच्या प्रेरणेने आज हरिभक्तपरायण पू. भास्करगिरी बाबा यांनी समाजभिमुख उपक्रम, संवाद आणि कार्यक्रमांच्या माध्यमातून देवगडला आध्यात्मिकतेचे आणि आत्मोन्नतीच्या चळवळीचे केंद्र बनविले आहे.

“स्वच्छ, समाधानी, हव्याहव्याशा वाटणाऱ्या शांततेचा आविष्कार म्हणजे देवस्थान.”

येथे भक्तांना भारतीय संस्कृतीचे यथार्थ दर्शन घडते. स्वच्छता, निसर्गसौंदर्य याबरोबरच त्याग, तपश्चर्या आणि मानवकल्याणाच्या चिंतनाला धीरगंभीर सुगंध आहे. हा सुगंध पू. किसनगिरी बाबा आणि पू. भास्करगिरी बाबा यांनी आपले जीवन चंदनासारखे झिजवून निर्माण केला आहे.

🌼 त्यांचे जीवनकार्य प्रत्येकाला प्रेरणा देणारे आहे. 🌼